शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

मातापित्याचे ऊपकार

पंचेचाळीशितल्या एका तरुणाच्या  "पत्नीचा" आकस्मिक मृत्यु होतो.

बर्‍याच लोकांनी त्याला दूसर्‍या लग्नाचा सल्ला दिला परंतु "माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन" असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने टाळले.

बघता बघता दिवस, महीने वर्षे निघून गेली. मुलगा मोठा झाला. आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले.

हे पीता महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या आॅफिस मध्ये, तर कधी मुलाच्या आॅफिस मध्ये असा ईथे तिथे आपला वेळ व्यतीत करु लागले. थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली.आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले.

बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे पीता महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले. त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले. यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले.

जेवण झाले. हे पीता महाशय हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बसले. मुलगा अजून जेवत होता. त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असता तीने लगेच कपाटातुन दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढून घेतले.

जेवणानंतर मुलगा काही न बोलता आॅफिसला निघून गेला.
दुसर्‍या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडीलांना म्हणाला "बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार अहोत"  पिता महाशयांना आपले काय चुकले हे समजेना. सावरत ते मुलाला म्हणाले "बाळा आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे? तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने, तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे. अर्थातच तुलाही आता दूसर्‍या आईची गरज नाही"

यावर मुलगा म्हणाला "बाबा मला तुमच लग्न करायच आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. ऊद्या पासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात रहायला जातोय आणि त्याचबरोबर मी ऊद्यापासुन तुमची सारी मालमत्ता तुमचा सारा व्यवसाय तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या आॅफिसमध्ये एका सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही."

कथा संकलित आहे परंतु समस्या अगदी गंभिर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभिर मुलांची समाजास अत्यंत आवश्यकता आहे.

मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही !