भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''
तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.